Wednesday, October 27, 2010

आ. ह. साळुंखे यांना दुदुस्कर पुरस्कार प्रदान
सातारा, २ सप्टेंबर/प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या शिक्षणसम्राटांच्या विकासामुळे शिक्षणाचे बाजारीकरण वाढले असून, बहुजन समाजाचे शिक्षण धोक्यात आले आहे. ही चिंतेची बाब असल्याची खंत ज्येष्ठ विचारवंत अ‍ॅड. गोविंद पानसरे यांनी व्यक्त केली.
येथील सातारा मराठा विद्या प्रसारक समाज व कला, वाणिज्य महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे संस्थापक राबहादूर दुदुस्कर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा या वर्षीचा कृतज्ञता पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष शरदराव चव्हाण, उपाध्यक्ष अ‍ॅड. संभाजीराव नलावडे, सचिव प्रश्न. रामचंद्र जाधव, प्रश्नचार्य डॉ. यशवंत पाटणे व मृणालिनी दुदुस्कर आदी मान्यवर उपस्थित होते.
अ‍ॅड. गोविंद पानसरे म्हणाले की, थोर शिक्षण महर्षीची परंपरा मोडीत काढून शिक्षणसम्राटांनी त्याचा धंदा मांडून शिक्षणाची विक्री सुरू केली आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबरोबर या शिक्षणसम्राटांचे नाव घेतले जाते हे खेदजनक आहे. वाईटाला वाईट म्हणायला कचरता कामा नये. कृतीविना विचार, तत्त्वज्ञान शून्य आहे. डॉ. आ. ह. साळुंखे यांचा सत्कार हा त्यांच्या विचारांचा सत्कार आहे. समाजात अशा माणसांचे सत्कार दुर्मिळ झाले असून, नको त्या विचारशून्य व्यक्तींचा सत्काराचे स्तोम फोफावले आहे.
डॉ. आ. ह. साळुंखे सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, गौतम बुद्ध, राजर्षी शाहूमहाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड, म. फुले व डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची परंपरा जोपासणे व ती कृतीत आणणे गरजेचे आहे. कोणत्याही महापुरुषांचे विचार चिकित्सकपणे तपासून मगच ते स्वीकारावेत. माझे लेखनही डोळसपणे तपासले तर मला अधिक आनंद वाटेल. गौतम बुद्धाकडे एक समाजचिंतक म्हणून पाहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

No comments: