Wednesday, October 27, 2010

धर्मवाद आणि जमातवादांचे मराठी साहित्यात उमटलेले पडसाद : एक चिंतन

धर्मवाद आणि जमातवादांचे मराठी साहित्यात उमटलेले पडसाद : एक चिंतन
-
Wednesday, April 14, 2010 AT 05:00 AM (IST)

धर्म, अर्थ, संस्कृती, राजकारण इ. क्षेत्रातील अनुभव व आकांक्षाचा अविष्कार म्हणजे साहित्य व्यवहार असतो. अशा या साहित्य व्यवहारात धर्मबाद आणि जमातवादाचे पडसाद उमटले की नाही त्यापेक्षा ते कशा पद्धतीने उमटले याची चर्चा करणे अधिक अर्थपूर्ण ठरेल.
चर्चेतील ठळक बाबी
1) रुढ अर्थाने येणाऱ्या धार्मिक वाङ्‌मयाची यात चर्चा नसून धर्मबाद व जामतवादाने व्यापलेल्या मानवी जीवनाचे मराठी साहित्य कसे पडसाद उमटले ? 2) धर्माचा मानवी जीवनातील सामाजिक नैतिकतेचा भाग म्हणून कधी माणसांच्या आदीम प्रेरणांच्या स्वरुपात, कधी समाजधारणेचे ऐहिक तत्त्व म्हणून, कधी व्यवस्था परिवर्तनाची क्रांतीकारी आणि मुक्तीदायी भूमिका तर कधी दमन-शोषणाची क्रूर यंत्रणा म्हणून होणाऱ्या वैचीत्र्यपूर्ण स्थितीचे साहित्यात कसे प्रतिबिंब उमटले ? 3) सामाजिक शास्त्राचा अभ्यासक आणि सृजनशील साहित्यिक या दोन्हीची साहित्याकडे पाहणी दृष्टी भिन्न असे. कारण मानवी भाव-भावनांच्या द्वंद्ववाचा वेध उदा. प्रेम-क्रौर्य, आशा-निराशा, स्वप्नांची मोहकता-वास्तवांची दाहकता अशा विविध घटनांचा वेध सृजनशील साहित्यिक घेत असतो. तर अभ्यासकाने केलेली चिकित्सा ही त्या साहित्य कृतीच्या मूल्यांच्या संदर्भात केलेले भाष्य असते. समाजचिकित्सेत समाजदर्शन घडविणे हे या भाष्यामागचे प्रयोजन लक्षात ठेवून ही चर्चा केली आहे. 4) एकूण साहित्यप्रवाहात धर्म किंवा जमातवाद विषयक विश्लेषणात राहून गेलेल्या उणिवा व आगामी साहित्यविश्र्वाकडून असणाऱ्या अपेक्षा हा या चर्चेचा समारोप आहे.
धर्म आणि साहित्य यांचा सहसंबंध
धर्म आणि मराठी साहित्याचे नाते बहुआयामी आणि व्यामिश्र आहे. 19 व्या शतकात ख्रिस्ती धर्मप्रसारकांच्या कार्यामुळे महाराष्ट्रात जी प्रबोधनाची पिढी अवतरली तिने धर्म आणि साहित्य यांच्या परंपरागत नात्यात अमूलाग्र बदल घडवून आणला.
चांगल्या साहित्याचे प्रयोजन म्हणजे धर्मजागृती, धर्मशिक्षण ही पारंपारिक मानसिकात झुगारुन धर्माशिवाय साहित्याची अन्य प्रयोजनही असू शकतात हा नवा विचार मांडला. साहजिकच या नव्या प्रबोधनकारी विचाराने धर्म आणि साहित्याची एकरुपता भंग पावली.
प्रबोधनकालिन धर्मचिकित्सेने साहित्य प्रेरित झाले तर तात्कालिन साहित्याने धर्मविषयक विचार अधिक समृद्ध केला. ईश्र्वर परायणता, धार्मिकता, नैतिकता यांचा परस्परसंबंध व धर्म ही दैवी संस्था की ऐतिहासिक घटना अशा प्रश्नांच्या साधक-बाधक चर्चेतून मराठी साहित्याने प्रचंड गद्यनिर्मिती केली. धर्मशास्त्र व धर्मपंडितापुरता असलेल्या धर्मचिकित्सेचा अधिकार 19 व्या शतकातील प्रबोधनाने अधिक सार्वत्रिक बनवला.
प्रबोधनकारी पिढीने धर्माचा मोक्षदायी आशय गौण ठरवून मुक्तीदायी व मानवनिष्ठ आशय अधोरेखित केला. धर्म, जात, प्रथांच्या नावावर होणारी घुसमट शोषण यावर प्रकाश टाकणारे वैचारिक नाटके, कथा, कादंबऱ्या इ. साहित्य निर्माण होऊ लागले.
विष्णुबुवा ब्रह्मचारीचे "समुद्रकिनारीचे वाद-विवाद' न्या. रानड्यांची "धर्मपर व्याख्याने', ह.ना. आपट्यांच्या सामाजिक आशय सांगणाऱ्या कादंबऱ्या. श्री.ना.पेंडसेची वर्णसंस्कार भाष्य करणारी "गारंबीचा बापू', श्रीधर व्यंकटेश केतकरांची "ब्राह्मणकन्या' "तृतीय रत्न' पासून "सार्वजनिक सत्यधर्म' पर्यंतचा म. फुले यांचा ब्राह्मण वादाची परखड चिकित्सा करणारा साहित्यप्रवास, स्त्रीयांची आत्मचरित्रे व स्मृतीचित्रे हे सर्व 19 व्या शतकातील धर्मचिकित्सेतून येणाऱ्या जीवनमूल्यांची चर्चा करताना दिसतात.
धर्माचे साहित्यातील बदलते अविष्कार
धर्माच्या बदलत्या अविष्कारांचे प्रतिबिंब समकालीन साहित्यात पडत असते. 19 व्या शतकातील धर्माचे विवेकनिष्ठ स्वरुप 20 व्या शतकाच्या पूर्वार्धात हिंदू-मुस्लिम जमातवादाच्या दंगलीमुळे निस्पृतीत गेले.
राज्यकर्त्यांची भेदनिती, दमननिती, शीख, मुस्लिम व ब्राह्मणेत्तर समूहांना वेगळी ओळख देणारे सुधारणा कायदे, याचा परिणाम धर्म मूलत: एका बाजूला जमातवाद तर दुसऱ्या बाजूला राष्ट्र वादाच्या रुपात अवतरु लागला.
साधर्म्यापेक्षा वेगळेपणा अधोरेखित करणाऱ्या संप्रदाय भावनेमुळे दुसऱ्या जमातीचा माणूस नुसता परकाच नाही तर संशयास्पद वाटू लागला. यातूनच धार्मिक जमातवादाची प्रक्रिया सुरु झाली. जमातवादी धर्माचे खोलवर विश्लेषण करणारे प्रत्ययकारी वर्णन तत्कालीन मराठी साहित्यात आभावनेच आढळते. उलट या जमातवादी दृष्टीचाच अविष्कार सावरकरांच्या अंदमानोत्तर साहित्यात नाटक कादंबऱ्या इत्यादीतून प्रतिबिंबीत होतो. पुढे मुसलमान हा व्हीलन, बलात्कारी किंवा दृष्ट असल्याने चित्रीत होणे हा निव्वळ योगायोग नसतो तर जमातवादी दृष्टीचा तो साहित्यिक अविष्कार असतो.
फाळणीच्या आघाताने व दंगलीने जमातवादी दृष्टी अधिक गडद झाली तर 1956 च्या डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतरामुळे हिंदू समाजाला आणखी एक हादरा बसला आणि मुस्लिम विरोधाबरोबरच दलित विरोधाचा उघड आयाम हिंदू जमातवादास प्राप्त झाला. पण र.वा.दिघे, हमी दलवाई यासारख्या चार दोन साहित्यीकांचा अपवाद वगळता फाळणी, दंगली किंवा जमातवादास नाटक-कादंबरीचा विषय बनवण्याबाबत अनेक साहित्यिक उदासिनच राहिले.
1990 च्या दशकात मात्र जेंव्हा मराठी साहित्य चळवळीचे व्यासपीठ कार्यरत झाले तेंव्हा जावेद कुरेशी, एहत मामू देशमुख, मुबारक शेख, फ.म. शहाजिंदे, डॉ. अझीज नवाब, इलाही जमादार, फक्रूदीन बेन्नूर या मुस्लिम मराठी साहित्यिकांनी मुस्लिमांच्या एकांगी चित्रणाबाबत आवाज उठवला.
मुस्लिमांप्रमाणेच ख्रिस्ती, जैन, बौद्ध, मराठी लेखकांनी आपापल्या साहित्यकृतीतून धार्मिक प्रश्न मांडला. 1980 च्या नंतर त्या-त्या धर्मांतर्गत जगण्याचे प्रश्न, हिंद्ववेत्तर धर्मातील जातीग्रस्त अवस्था, त्यांच्यावरील पारंपारिक हिंदू संस्कृती व कर्मकांडाच्या प्रभावामुळे "घरका ना घाट का' अशी निर्माण झालेली त्रिशंकू अवस्था विविध धर्मीय समाजाअंतर्गत लिंगभेदभावात्मक शोषणाचे प्रश्न, धार्मिक अल्पसंख्य म्हणून वाट्याला येणारी उपेक्षा व असुरक्षा यातून अपरिहार्यपणे धर्मवाद, जमातवाद व मुलतत्ववादाकडे नेणारा परतीचा प्रवास यांचे चित्रण या समूहांनी केले आहे.
जातीग्रस्त जीवनाच्या प्रश्नांना पहिल्यांदा वाचा फोडली ती डॉ. आंबेडकरांनी, दलितांप्रमाणेच वर्णव्यवस्थेने अलग ठेवलेल्या आदिवासी भटके विमुक्त या जमातीतूनही विद्रोही साहित्य निर्माण झाले. कॉ. शरद पाटील यांनी प्राचीन ते अर्वाचीन काळापर्यंत केलेली भारतीय इतिहासाची पूनर्मांडणी किंवा डॉ.आ.ह. साळुंखे यांनी धर्म व संस्कृतीची केलेली चिकित्सा मराठी साहित्याला वेगळे वहण देणारी आहे.
डॉ. रावसाहेब कसबे, गो.नी. दांडेकर, श्री.ना. पेंडसे, खानोलकर, रंगनाथ पाठारे, राजन गवस, आनंद यादव यांच्या साहित्यातील ग्रामीण जीवनदर्शन विशेष उल्लेखनीय आहे.
स्त्रीवादी धर्मचिकित्सा
भारतात प्लेबीया ऍग्नीस, झोया हसन, रझीया पटेल, तिस्ता सेटलबाड, लतिका सरकार इत्यादींनी विविध धर्मीयांच्या कायद्याच्या अनुषंगाने धर्माचा विचार केला तरी सर्वांगिण मुक्तीदायी धर्मशास्त्र मांडण्याचे प्रयत्न अद्याप सुरु झालेले नाहीत. धर्मग्रस्ततेमुळे निर्माण होणाऱ्या घटस्पोटित विधवा, परित्यकता, बहुपत्नीकत्व आदी प्रश्नांची चर्चा स्त्रीवादी विश्र्वात असली तरी त्याचे फारच थोडे पडसाद मराठी साहित्यात उमटले आहेत.
दलित स्त्री-पुरुष साहित्यिकांनी, मुरळी, देवदासी, जोगीनी हे प्रश्न प्रकर्षाने मांडले. लैंगिक व सांस्कृतिक शोषणाला मान्यता देणाऱ्या धर्मव्यवस्थेचे प्रत्यकारी चित्रण बाबुराव बागुलांच्या "सुड'सारख्या दिर्घकक्षेत येऊन जाते तर अर्थव्यवस्थेने जन्मास घातलेल्या देवदासी, जोगत्या या शोषण यंत्रणेचे दाहक वर्णन राजन गवस यांच्या "भंडारभोग' या कादंबरीतून येते. वर्णसंकरातून जन्म झाल्यावरची अधातरी अवस्था शरणकुमार लिंबाळे यांच्या "अक्करमाशी' या साहित्यकृतीतून तर सगळेच वडार किंवा पारधी चोर नसतात पण जातीच्या शिक्क्यामुळे होणारी घुमसट लक्ष्मण गायकवाडाच्या "उचल्या' या आत्मचरित्रातून प्रकट होते. याच पद्धतीने डॉ. किशोर काळे यांचे "कोल्हाट्याचं पोरं' किंवा हंसा वाडकरांची "सांगत्ये ऐका' अलिकडच्या काळातील स्वलिखित "शापीत पैंजण' सारखा काव्यसंग्रह यातून पुरुषप्रधान संस्कृतिक पाठिंबा देणाऱ्या धर्मव्यवस्थेतील समीक्षा संबंधितांनी केली. पण त्या तुलनेत सानीया, मेघना पेठे, गौरी देशपांडे, प्रिया तेंडूलकर यांनी फक्त भांडवलशाही व्यवस्थेतील स्त्रीचे होणारे वस्तूकरण व परात्मीकरण याचीच चर्चा आपल्या साहित्यात केली आहे. एका बाजूला धर्मग्रस्त स्त्रीयांच्या खोल जाण व त्याबद्दलची सूचक मांडणी दुर्गाबाई भागवत, इरावती कर्वे यांच्या ललित लेखनात तर दुसरीकडे ती अरुणा ढेरे यांच्या "भगव्या वाटा' किंवा "कृष्ण किनारा' या सारख्या पुस्तकातून स्त्रीसंतांच्या स्त्रीत्वाची घेतलेली दखल म्हणजे समर्थ स्त्री जीवनाचा ठाव असे म्हणता येईल. इरावती कर्वे यांच्या परीपूर्ती सारख्या लेखनातून ख्रिस्ती धर्म ग्रस्त स्त्रीयांचे भावविश्र्व किंवा हिंदू-ख्रिस्ती स्त्रीचे मनोधारणा सुचकतेने लक्षात घ्यावी.
निष्कर्ष
1) दलित साहित्याने जशी धर्मव्यवस्थेला केंद्रस्थानी ठेवून स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्त्वावर आधारित धर्मव्यवस्थेची कठोर चिकित्सा किंवा समीक्षा केली व ती आपल्या कथा, कादंबऱ्या, नाटके यासारख्या साहित्यकृतीतून मांडली तशी चिकित्सा ग्रामीण व प्रादेशिक साहित्यात किंवा इतर धर्मीय लेखकांनी केलेली फारशी दिसत नाही. 2) "रात्र काळी घागर काळी' किंवा "चानी' सारख्या खानोलकरांच्या साहित्यकृतीतून आदीम प्रेरणांच्या रुपाने वावरणाऱ्या व प्रसंगी हिंसा व उन्माद या रुपात प्रकट होणाऱ्या धर्माचे प्रत्ययकारी वर्णन अपवादात्मक आहे. एरवी नॉस्टेलजिक उमाळा किंवा पारंपारिक भक्तीसंप्रदायाकडून पोसल्या जाणाऱ्या धर्मसमन्वयाची समुदायाची भलावण व प्रसंगी उदात्तीकरण करण्यापलिकडे ग्रामीण व प्रादेशिक साहित्याने फारसे काही केलेले दिसत नाही. 3) दलित स्त्री-पुरुष साहित्यिकांनी मिळून धर्मग्रस्त समाज व्यवस्था व धर्मगग्रस्त स्त्रियांचे प्रश्न मांडले मात्र मुस्लिम मराठी साहित्यातील तलाकपीडितांचे किंवा बहुपत्नीकत्वाचे प्रश्न हे लेखिका स्त्री असल्यामुळे मांडले गेले. ते ही अत्यंत तुरळक व स्फूट आहे. 4) मराठी वैचारिक साहित्यात धर्म आणि संस्कृती यांच्या चिकित्सेची एक समृद्ध परंपरा आहे. वि.रा. शिंदे, सानेगुरुजी, लक्ष्मणशास्त्री जोशी, आचार्य विनोबा भावे यांचे संस्कृती चिंतन म्हणजे धर्म चिकित्साच आहे. अगदी अलिकडच्या काळात "तुकाराम दर्शनच्या' माध्यमातून "सदानंद मोरेंनी' केलेले भाष्य किंवा दिलीप चित्रे यांनी "तुकोबाच्या काव्यांचा घेतलेल्या वेध' हा ही समकालीन मराठी संस्कृतीविषय चर्चाविश्र्वाचा एक समृद्ध धर्मचिंतनाचा भाग आहे. मात्र त्याचा मागमूसही मराठी कथा कादंबऱ्यातून दिसून येत नाही.
-
प्रा. सुषमा अंधारे
राज्यशास्त्र विभाग,

No comments: