Wednesday, October 27, 2010

डॉ. आ ह साळुंखे सांस्कृतिक धोरण अंमलबजावणी आढावा सदस्यपदी..



समाजवाद मूठभर लोकांच्या ताब्यात
-
Monday, July 19, 2010 AT 12:00 AM (IST)

सातारा - समाजवाद मूठभर लोकांच्या ताब्यात असून, भांडवलदारांचे वर्चस्व कमी झाल्याशिवाय समाजवाद अस्तित्वात येणार नाही. सगळ्यांचे कल्याण म्हणजे समाजवाद असा सूर विविध मान्यवरांच्या समाजवाद ते नक्षलवाद या महाचर्चेतून निघाला.

राज्य कामगार सुरक्षा दल, प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल, दलित विकास आघाडी यांच्यातर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मृतिदिनानिमित्त आयोजित समाजवाद ते नक्षलवाद या महाचर्चेत पद्मश्री लक्ष्मण माने, सरचिटणीस प्रवीण बाराथे यांनी सहभाग घेतला. अध्यक्षस्थानी अण्णाभाऊंचे सहकारी प्रा. रतनलाल सोनाग्रा होते. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक आ. ह. साळुंखे, कामगार सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांची प्रमुख उपस्थिती होती.
लक्ष्मण माने म्हणाले, ""कोणाच्या मालकीचे काहीही नाही म्हणजे साम्यवाद, तुमचे श्रम विकत घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे तो भांडवलदार. उत्पादन साधनाची मालकी कोणाची यावर समाजवाद अवलंबून आहे. आज मूठभर लोकांच्या हातात समाजवाद अडकला आहे. ज्या लोकशाहीचे स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिले ती आपल्या हातून कधीच निघून गेली आहे. सत्ता, संपत्ती, समाजवाद येईल असे वाटत होते ते सर्व मार्ग बंद झाले आहेत. श्रीमंत गरिबांतील अंतर वाढत आहे. यामुळे पुढील काळात जाती जातीत फूट पाडण्याचे प्रकार होणार नाहीत. लोकशाही पद्धतीने सत्ता, संपत्ती व समाजवाद वाटला जाईल. त्यासाठी नक्षलवाद उपयोगाचा नाही. नक्षलवादी आपले मित्र आहेत; पण त्यांनी विचाराला विचारांनी मारले पाहिजे.''

डॉ. आ. ह. साळुंखे म्हणाले, ""अण्णा भाऊ साठेंनी विलक्षण प्रतिभेच्या जोरावर समाजातील लोकांच्या दु:खाला वाचा फोडणारे वाङ्‌मय निर्माण केले. चिमणीला ज्याप्रमाणे चिवचिवण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे सर्वांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे.''

प्रवीण बाराथे म्हणाले, ""समाजवादाची व्याप्ती मोठी आहे. साम्यवादाची पहिली पायरी समाजवाद होय. आपल्याकडील काही राज्यात नक्षलवाद सुरू झाला. नक्षलवाद ही साम्यवादी चळवळीचा जहाल गट आहे. जाती व्यवस्था नष्ट होत नाही तोपर्यंत समाजवाद या देशात येऊ शकत नाही.''

अध्यक्षस्थानावरून रतनलाल सोनाग्रा म्हणाले, ""समाजवादी लढे बौद्धिक होते. व्यवस्था बदलायला हवी होती ती बदललेली नाही. अण्णा भाऊंनी नव्या विचाराचा समाजवाद आणण्याचा विचार दिला.''

या वेळी अमर गायकवाड, कुंडलिक पाटोळे, विजय गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.

या वेळी डॉ. आ. ह. साळुंखे यांचा कामगार सुरक्षा दल व दलित विकास आघाडीतर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास हरिभाऊ वाघमारे, विजयराव गायकवाड, प्रल्हाद साठे, वसंतराव बडेकर, सुनील आवळे, जगन्नाथ फाळके, लालासाहेब खुडे, संजय भोसले, मनोज घाडगे, गोपाळराव साठे, हनुमंत गायकवाड, रवींद्र खुडे, नाना आवळे, संतोष गायकवाड, साईनाथ खंडागळे, संतोष पवार, बाबासाहेब बोबाटे, अशोक बोबाटे आदींसह कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.

अनेक विषयांच्या अभ्यासामुळे वेगळी दृष्टी मिळते : डॉ. साळुंखे
ऐक्य समूह
Sunday, September 19, 2010 AT 01:15 AM (IST)
Tags: news
सातारा, दि.18 : जगभर अध्ययनाची ताकद विस्तारत आहे. अशावेळी केवळ एकाच विषयाचा अभ्यास करुन चालणार नाही तर अनेक विषयांचा अभ्यास असणे केव्हाही चांगले. यामुळे वेेगळी दृष्टी प्राप्त होत असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले.
येथील अनंत इंग्लिश स्कूलमधील विज्ञान शिक्षक विलास सोनावणे यांनी लिहिलेल्या व लोकायत प्रकाशन, सातारा यांनी प्रकाशित केलेल्या रयतेचा राजा या पुस्तकाचे प्रकाशन शाळेमध्ये मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. साळुंखे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सातारा एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह चं. ने. शहा, प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी गोंधळी, शालाप्रमुख शहाजीराव देशमुख उपस्थित होते.
डॉ. साळुंखे म्हणाले, आज जग विस्तारत असल्याने केवळ एकच विषय धरुन चालणार नाही. लेखक जरी विज्ञान विषयाचे शिक्षक असले तरी त्यामुळे त्यांच्या लेखनाला वैज्ञानिक दृष्टी लाभली आहे. विज्ञानाचे शिक्षक मानव्यशास्त्र विषयात चांगले लेखन करू शकतील, असे मत व्यक्त करुन संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षात शाळेमधील शिक्षकाचे पुस्तक प्रकाशित होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी पुस्तकाच्या निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. शाळेचे उपशालाप्रमुख शिवाजी राऊत यांनी अत्यंत ओघवत्या भाषेत पुस्तकाचे विश्लेषण केले. ते म्हणाले, इतिहासाचे मूलगामी लेखन करायला ताकद असायला लागते. त्यातून युगपुरुष असणाऱ्या छत्रपतींबद्दल लेखन करताना खूप अवधानं बाळगावी लागतात. पण सोनावणे यांनी एकूण 57 संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करुन रयतेचा राजा हे पुस्तक सिध्द केले आहे.
यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय मांडके यांनीदेखील आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले, सोनावणे यांनी अतिशय संयम बाळगून या पुस्तकाचे लेखन केले आहे. यात कोणावरही अवास्तव टीका केलेली नाही किंवा छत्रपतींच्या जीवनातील कोणत्याही चमत्काराला स्थान दिले नाही, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
शिक्षण अधिकारी गोंधळी म्हणाले, हे केवळ इतिहासाचे पुस्तक आहे असे समजता कामा नये तर त्यापासून
प्रेरणा घेवून शालेय उपक्रमात याचा कशा प्रकारे उपयोग करुन घेता येईल, याचा विचार केला पाहिजे.
विलास सोनावणे यांनी लेखनामागील आपली भूमिका स्पष्ट केली. ते
म्हणाले, छत्रपतींच्या जीवनाचा मागोवा घेण्यासाठी शिवभारत हे काव्य शिवकालाचा अस्सल पुरावा आहे. छत्रपतींनी जरी स्वराज्याची स्थापना केली असली तरी त्याआधीपासून त्याचा विचार शहाजीराजे आणि जिजामाता यांचा सुरू होता. छत्रपतींनी कायम रयतेचा विचार केला म्हणूनच रयतेची त्यांच्यावर निष्ठा होती.
कार्यवाह शहा यांनीही पुस्तक लेखनाबद्दल सोनावणे यांचे अभिनंदन केले व त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या. शाळेचे शिक्षक शेख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शालाप्रमुख शहाजीराव देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमास संस्थेचे शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, पालक व मान्यवर उपस्थित होते.

No comments: