Monday, August 9, 2010

Dr.A.H.Salunkhe Awarded By Chhatrapati Shahu Award

डॉ. आ. ह. साळुंखे यांचा शनिवारी गौरव समारंभ

आकाशवाणीवर आज मुलाखत

सातारा, ७ जुलै/प्रतिनिधीज्येष्ठ विचारवंत, राज्य मराठी धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या विद्यार्थ्यांनी येत्या शनिवारी त्यांचा गौरव समारंभ आयोजित केला आहे. गुरुवारी व शुक्रवारी सातारा आकाशवाणीवर त्यांची प्रदीर्घ मुलाखत होणार आहे.प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांनी गेली वीस वर्षे संशोधनातून व वैचारिक लेखनातून अनेक मौल्यवान ग्रंथांची निर्मिती केली आहे. आपल्या या गुरुच्या कर्तृत्वाचा गौरव करावा आणि त्यांनी आपल्याला दिलेल्या विद्येच्या ऋणाचे स्मरण करावे, या उद्देशाने प्रा. डॉ. साळुंखे यांच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या ऋण- स्मरण कार्यक्रमाचे आयोजन शनिवार, दि. १० जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता सातारा येथे केले आहे.कै. श्री. घ. प्रतापसिंहमहाराज (थोरले) नगरवाचनालय, सातारा येथे प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांचा सत्कार त्यांचेच एक विद्यार्थी आणि सध्या सैनिक स्कूल सातारा येथे अध्यापनाचे काम करीत असलेल्या किशोर रसाळ यांच्या हस्ते होणार आहे.ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांना कोल्हापूर येथे नुकतेच ‘शाहू पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. आ. ह. साळुंखे यांनी काम पाहिले आहे. राजभाषा मराठी धोरण सल्लागार समितीवरही प्रा. डॉ. साळुंखे यांची नुकतीच निवड झाली आहे. परिवर्तनवादी समतावादी अनेक संघटना, कार्यकर्त्यांना प्रा. डॉ. साळुंखे मार्गदर्शन करतात. या कर्तृत्वाचाच गौरव ऋण स्मरणाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.आज व उद्या सातारा आकाशवाणीवर मुलाखतप्रा. डॉ. आ. ह. साळुंखे यांची सातारा आकाशवाणीवरून गुरुवारी (दि. ८) व शुक्रवारी (दि. ९) सकाळी ९.३० वाजता मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत किशोर बेडकीहाळ, प्रा. डॉ. शरद गायकवाड व डॉ. गीतांजली पोळ यांनी घेतली आहे.

तरुणाईने शाहूंचे विचार समजून घ्यावेत - डॉ. आ. ह. साळुंखे
-
Sunday, June 27, 2010 AT 12:15 AM (IST)
Tags:
western maharashtra, kolhapur, youth, shahu maharaj
कोल्हापूर - "राजर्षी शाहूंनी दाखविलेल्या मार्गावरून केवळ दोन पावलं चाललो तर माझा इतका सन्मान झाला. तरुणाईने शाहू विचार समजून घेऊन वाटचाल केली तर आपलाही किती सन्मान होईल, हे आता तरी समजून घ्यावे. कोल्हापूर हे माझे दुसरे हृदय असून राजर्षी मला जणू कवटाळून कौतुक करत आहेत,'' अशा शब्दांत आज ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी भावना व्यक्त केल्या.येथील राजर्षी शाहू मेमोरिअल ट्रस्टतर्फे डॉ. साळुंखे यांना ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या हस्ते आज शाहू पुरस्काराने सन्मानित केले. एक लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. तुडुंब भरलेल्या शाहूप्रेमींच्या उपस्थितीत शाहू स्मारक भवनात दिमाखदार सोहळा झाला. आर्थिक महासत्तेचे स्वप्न घेऊन सध्या वाटचाल सुरू असली तरी राजर्षींनी केलेल्या कार्याच्या जोरावरच आज आपण हे स्वप्न पाहू शकतो; मात्र विज्ञानातील प्रगतीबरोबरच सामान्य माणसांचा जीवनस्तर उंचावण्यात अयशस्वी ठरलो तर हे स्वप्न अपूर्ण ठरेल, असा संदेश यानिमित्ताने झालेल्या वैचारिक मंथनातून
मिळाला.विज्ञाननिष्ठा, जागतिकीकरण, सामाजिक चळवळींची सद्यःस्थिती अशा विविध अंगांनी डॉ. साळुंखे यांनी संवाद अधिक खुलवला.ते म्हणाले, ""विज्ञानाशिवाय प्रगती अटळ असली तरी त्यावर विवेकाचा अंकुश असावा. जागतिकीकरणाच्या आव्हानांना सामोरे जावेच लागेल. त्यासाठीच्या स्पर्धेत माणूसपण मात्र टिकवावे. चिमणी घरट्यात स्वच्छंदपणे जीवन जगत असेल तर माणूस असं जीवन का जगू शकत नाही, असा प्रश्‍न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे. माणसामाणसांना जोडणारे नवे सेतू आता निर्माण झाले पाहिजेत.''प्राचार्य पी. बी. पाटील म्हणाले, ""धर्म म्हणजे सर्व सजीवांना आधार व प्रेरणादायी ठरणारा, त्यांच्या निर्वाहाच्या व्यवस्थेचा आणि संरक्षणाचा विचार असतो; मात्र खरा धर्म अजूनही माणसाला समजलाच नाही. प्रस्थापितांनी केवळ कर्मकांडात बुडविलेल्या महामानवांचे विचार डॉ. आ. ह. साळुंखे यांनी आता पुन्हा रुजविले असून, त्या विचारांची पालखी प्रत्येक पिढीने पुढे नेली तर भारतधर्म खऱ्या अर्थाने विश्‍वधर्म होईल.''माणसाच्या जन्मापासून ते त्याचे संगोपन, शिक्षणव्यवस्था आणि धर्मव्यवस्था अशा सर्वच पातळ्यांवर माणसाची स्वभावसिद्ध जिज्ञासा जाणीवपूर्वक दाबून, भ्रमिष्ट करून, मुरगळून टाकली गेली, असे वास्तव मांडत ब्राह्मणी संस्कृतीवर प्राचार्य पाटील यांनी प्रहार केला. ते म्हणाले, ""माणसाची स्वभावसिद्ध जिज्ञासा जितकी जाज्वल्य आणि प्रखर असते, तितका माणूस मोठा होत असतो; पण इतिहासाचा धांडोळा घेतला तर प्रस्थापित वैचारिक आणि सांस्कृतिक नेतृत्व करणाऱ्यांनी ही जिज्ञासाच मारून टाकण्याचे काम केले. सामान्य माणसाला इहलोकातून परलोकात नेऊन ठेवले. धर्माच्या कितीही व्याख्या केल्या, अर्थ सांगितला, मीमांसा केली तरीही माणसाला खरा धर्म अद्याप समजलेला नाही. डॉ. साळुंखे यांनी मात्र प्रस्थापितांच्या विरोधाला न जुमानता मानवतावादी विचारवंतांना पुन्हा एकदा समाजासमोर आणले आहे. त्यांना दिलेला पुरस्कार हा खऱ्या अर्थाने शाहू विचारांचा गौरव आहे.''ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी स्वागत केले. विश्‍वस्त डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. ज्येष्ठ विश्‍वस्त बाबूराव धारवाडे यांच्या हस्ते मान्यवरांचे सत्कार झाले. माजी कुलगुरू प्रा. रा. कृ. कणबरकर यांनी मानपत्राचे वाचन केले. कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, डॉ. जयसिंगराव पवार, सुभाष बोरकर, रमेश चव्हाण आदी उपस्थित होते. कोल्हापूरच्या मायेला अंतर देणार नाही - साळुंखेकोल्हापूरनं भरभरून प्रेम केलं असल्याचे सांगतानाच डॉ. साळुंखे यांनी त्यांच्या आजवरच्या संघर्षाच्या काळात प्रोत्साहन दिलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, निळू फुले, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांच्यापासून ते एन. डी. पाटील, गोविंद पानसरे, नागनाथअण्णा नायकवडी, प्राचार्य बाबर, रा. कृ. कणबरकर, बाबूराव धारवाडे यांच्यासह असंख्य चाहत्यांचे पाठबळ मिळाल्याचे सांगून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या पुरस्कारामुळे जबाबदारी आणखी वाढली असून मायेला कधीही अंतर देणार नाही, असे त्यांनी अभिवचन दिले.

डॉ. आ. ह. साळुंखे यांना दिमाखदार सोहळ्यात शाहू पुरस्कार प्रदान

27-06-2010 : 12:02:27)
कोल्हापूर, दि. २६ (प्रतिनिधी) : राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा असणाऱ्या कोल्हापूरने परिवर्तनवादी चळवळीचे केंद्र बनावे. त्यासाठी परिवर्तनवादी विचाराची पालखी वाहणारे डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली ही वाटचाल व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करत मुंबई, पुणे येथील संस्कृतीपासून दूर राहून शाहूराजांची ही नगरी पुढच्या काळात शाहूंचीच राहील, असा विश्वास ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पी. बी. पाटील यांनी व्यक्त केला.राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टच्या वतीने राजर्षी शाहू स्मारकाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचा मानाचा 'शाहू पुरस्कार' वितरण प्रसंगी ते बोलत होते.प्राचार्य पी. बी. पाटील म्हणाले, मुंबई, पुणे शहरांसारखी औद्योगिक संस्कृतीची पावले कोल्हापुरात पडली आहेत, पण ही संस्कृती गोकुळात शिरलेल्या पुतणा मावशीसारखी आहे. गेल्या पाच हजार वर्षांचे सिंहावलोकन होणे गरजेचे असून, या काळात सर्वसामान्य माणसाला यशाच्या शिखरावर जाण्याची उमेद देण्यापेक्षा ती खचण्याचे प्रयत्न झाले आहेत. माणूस जन्माला येताना प्राण्याचे पिल्लू म्हणून येतो. या प्राण्याचा माणूस होण्यासाठी त्याचे संगोपन व शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावत असतो. पाच हजार वर्षांत मानवतावादी विचारवंताना एका विशिष्ट प्रवाहातून बाहेर काढणे गरजेचे होते. त्यातील काही विचारवंताना डॉ. आ. ह. साळुंखे यांनी बाहेर काढण्याचे काम केले असून, प्रत्येक विषयात संशोधक अनेक तयार होतात, पण डॉ. आ. ह. साळुंख यांच्यासारखे नेतृत्व तयार होईल का, असा प्रश्नही प्राचार्य पाटील यांनी केला. धर्मव्यवस्थेवर सडकून टीका करताना प्राचार्य पाटील म्हणाले, धर्मव्यवस्थेने मानसिकदृष्ट्या समाजाला भ्रमिष्ट केले असून, शुद्ध मने अशुद्ध करण्याचे काम या व्यवस्थेने केले आहे.पुरस्काराला उत्तर देताना डॉ. आ. ह. साळुंखे म्हणाले, राजर्षी शाहूंनी जो मार्ग दाखविला त्यावरून मी दोन पावले टाकली तर इतका प्रेमाचा वर्षाव होतो. आणखीन चार पावले टाकली तर काय होईल हे तरुणांनी ध्यानात घ्यावे. शाहू महाराजांच्या नावाचा हा पुरस्कार माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठा आहे. या अपार प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याकडे शब्द नसल्याचे सांगत येथून पाठीमागे कोल्हापूर हे माझे दुसरे घर असे सांगत होतो, पण आता ते माझे घर नसून दुसरे हदय असल्याचे भावनिक वक्तव्यही डॉ. आ. ह. साळुंखे यानंी केले. हा पुरस्कार स्वीकारताना जणू शाहूंनी मला कवेत उचलून घेतल्याचे समाधान मनाला मिळाल्याचे सांगत कोल्हापूरकरांनी दिलेल्या या मायेला कधीही अंतर देणार नसल्याची ग्वाहीही साळुंखे यांनी दिली.शाहूंच्या दूरदृष्टीमुळे कोल्हापुरात कधी दुष्काळ पडत नाही. त्याप्रमाणे येथे शाहूंच्या समतेच्या विचाराचा दुष्काळही पडणार नाही याची दक्षता घ्यावी, असे सुचवत कलाकारांनी तयार केलेली वस्तू व शास्त्रज्ञांनी लावलेले शोध हे समाजातील सामान्य माणसाच्या जीवनात सुखाची पहाट आणणारी असावे. या शोधाचा समाज व्यवस्था सुधारण्यासाठी उपयोग व्हावा. अशी सर्जनशीलता निर्माण करण्याचे काम शाहू महाराजांनी केल्याचे साळुंखे यांनी सांगितले.जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी स्वागत केले, तर शाहू मेमोरियल ट्रस्ट सदस्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. आ. ह. साळुंखे यांना देण्यात येणाऱ्या गौरवपत्राचे वाचन करताना रा. कृ. कणबरकर म्हणाले, महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत डॉ. आ. ह. साळुंखे यांचे योगदान मोलाचे असून, बहुजन समाजातील या माणसाने हिदू धर्मग्रंथाच्या अंतरंगात शिरून ते अंतरंग समाजापुढे मांडण्याचे धाडस केले.राजर्षी शाहूंच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. आ. ह. साळुंख यांना प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. यावेळी ट्रस्टचे ज्येष्ठ सदस्य बाबूराव धारवाडे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू एन. जे. पवार, डॉ. जयसिगराव पवार, ट्रस्टचे सचिव रमेश चव्हाण, सुभाष बोरकर, आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपणपुरस्कार वितरण कार्यक्रमाला शाहूप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. शाहू सभागृह खचाखच भरल्याने सभागृहाबाहेर थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती. तब्बल अडीच तास उभे राहून शाहूप्रेमींनी हा सोहळा आपल्या डोळ्यात साठवून ठेवला.विद्यापीठातून ज्ञानयोगी बनावेतआजच्या शिक्षण प्रणालीवर टीकास्त्र सोडताना प्राचार्य पाटील म्हणाले, विद्यापीठातून ज्ञानयोगी, कर्मयोगी बनावेत अशी अपेक्षा असते, पण विद्यापीठात नुसते निरुपयोगी तयार करण्याचे काम केले जाते.



डॉ. आ. ह. साळुंखे यांना शाहू पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
Thursday, June 17, 2010 AT 12:30 AM (IST)
Tags: shahu award, kolhapur, western maharashtra
कोल्हापूर - रौप्यमहोत्सवी वर्षातील राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ परिवर्तनवादी विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे दरवर्षी पुरस्कार दिला जातो. लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. राजर्षी शाहू जयंतीनिमित्त शनिवारी (ता. 26) सायंकाळी साडेपाच वाजता शाहू स्मारक भवनात होणाऱ्या शानदार समारंभात पुरस्काराचे वितरण होणार आहे. पुरस्कार वितरणासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आमंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, 21 जूनपासून रोज सायंकाळी साडेपाच वाजता शाहू स्मारक भवनमध्ये मान्यवरांचे व्याख्यान आयोजिले आहे.यापूर्वी भाई माधवराव बागल, डॉ. शंकरराव खरात, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती, न्या. पी. बी. सावंत, कवी कुसुमाग्रज, अभिनेते चंद्रकांत मांडरे, गायिका आशा भोसले, डॉ. बाबा आढाव, शाहीर विशारद पिराजीराव सरनाईक, नियोजन मंडळाचे सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर आणि गेल्या वर्षी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना पुरस्कार प्रदान केल्याचे जिल्हाधिकारी देशमुख यांनी सांगितले. यावेळी ट्रस्टचे सचिव तथा जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश चव्हाण, विश्‍वस्त बाबूराव धारवाडे, रा. कृ. कणबरकर पत्रकार परिषदेस उपस्थित होते.परिवर्तनवादी विचारवंत म्हणून ख्याती असलेले डॉ. साळुंखे सध्या सातारा येथे वास्तव्यास आहेत. ते मूळचे शिवाजीनगर (ता. तासगाव, जि. सांगली) येथील आहेत. बी. ए.च्या परीक्षेत शिवाजी विद्यापीठात सर्वप्रथम आणि भारत सरकारची राष्ट्रीय शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आहे. चार्वाक-दर्शनाचा चिकित्सक अभ्यास या विषयावर त्यांनी पीएचडी घेतली आहे. येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सातारा येथील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयात 32 वर्षे संस्कृतचे आणि काही वर्षे मराठीचे अध्यापक म्हणून काम पाहिले आहे. नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या सातारा केंद्राचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. बेळगाव, लातूर, सोलापूर, सांगली, बीड जिल्ह्यांतील वेगवेगळ्या संमेलनात अधिवेशनात त्यांनी अध्यक्षपदे भूषविली आहेत.भूमिपुत्र गौतम बुद्ध या ग्रंथासह हिंदू संस्कृती आणि स्त्री, धर्म की धर्मापलीकडे?, महात्मा फुले आणि धर्म, विद्रोही तुकाराम, तुकारामांची शेतकरी, तुळशीचे लग्न - एक समीक्षा अशा अनेक ग्रंथांचे लेखन डॉ. साळुंखे यांनी केले आहे.

डॉ. आ. ह. साळुंखे यांना प्रतापसिंह स्मृती पुरस्कार
सकाळ वृत्तसेवा
Monday, January 18, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: dr.A. H. salunkhe, satara, western maharashtra
सातारा - येथील नगरपालिकेतर्फे देण्यात येणारा "छत्रपती प्रतापसिंह महाराज (थोरले) स्मृती सेवा पुरस्कार' ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांना जाहीर झाला आहे. शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असा या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रतापसिंह महाराजांच्या जयंतीनिमित्त सोमवारी सकाळी साडेदहा वाजता पालिकेच्या सभागृहात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. यापूर्वी संभाजीराव पाटणे, लीलाताई क्षीरसागर व पुरुषोत्तम शेठ यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या कार्यक्रमास जास्तीतजास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. वैशाली महामुने व उपाध्यक्षा सौ. सुजाता राजेमहाडिक यांनी केले आहे. पालिकेतर्फे उद्या (सोमवारी) सकाळी नऊ वाजता गोलबागेतील प्रतापसिंह महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर राजवाडा परिसरातील जुन्या पशुवैद्यकीय दवाखान्यापाठीमागील बाजूस पालिकेने विकसित केलेल्या पार्किंग मैदानाचे उद्‌घाटन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

इंटरनेट ज्ञान चिकित्सेनेच स्वीकारा- डॉ. आ. ह. साळुंखे


लोकसत्ता वृत्तान्त
सातारा, १५ फेब्रुवारी/प्रतिनिधीइंटरनेट ज्ञान स्वयंभू, स्वयंपूर्ण नाही. त्यावरील माहितीचा महाजाल वापरताना त्याची चिकित्सा करूनच स्वीकारावे, असे आवाहन राज्याच्या संस्कृती धोरण समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले.सातारा पत्रकार संघ व पुणे येथील डॉ. नानासाहेब परुळेकर चॅरिटी ट्रस्टच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. साळुंखे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय मांडके, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, उपाध्यक्ष हरिष पाटणे, कार्यशाळेचे समन्वयक ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर, ‘शोध मराठीचा’ चे जनक शुभानन गांगल आदी उपस्थित होते.शुभानन गांगल (मुंबई), संतोष देशपांडे (पुणे), प्रभाकर भोसले (पुणे), दीपा देशमुख (पुणे), सुदाम चौरे (मुंबई) आदी मान्यवरांनी या कार्यशाळेत प्रसारमाध्यमातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या परिणामकारक वापराबाबतचे मार्गदर्शन केले. डॉ. आ. ह. साळुंखे म्हणाले, विज्ञान तंत्रज्ञानाच्या विकासाचा आधार घेताना ते म्हणाले की, पत्रकारांसहित सर्वसामान्य नागरिकांनीही सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. नव्याने येणाऱ्या साधनांचे स्वागतच केले पाहिजे, पण ते करीत असताना त्यातली अपुरेपणा, त्रुटी ध्यानात घेण्याची गरज आहे. स्पर्धेच्या युगात येथून पुढे हे तंत्रज्ञान आत्मसात केल्याशिवाय पर्याय नाही. युनिकोड स्वीकारावे लागेल. मराठीबाबत फार अडचणी व गोंधळ आहे. त्यावर मात करावी लागेल, भाषा लिपीमध्ये देवनागरीला वेगवान करण्याची गरज आहे. राज्याच्या सांस्कृतिक धोरणात याबाबत समिती नेमण्याचा गांभीर्याने विचार करण्याचा प्रस्ताव सूचविण्यात आलेला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.प्रसारमाध्यमांचे सामथ्र्य प्रचंड आहे. ती फार मोठी ताकद आहे. म्हणूनच त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. उद्याच्या जगाला कोणत्या दिशेने जायचे हे प्रसारमाध्यमांच्या स्वरूपावर अवलंबून आहे. त्यामुळे उपलब्ध होत असणाऱ्या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून समाजाला पुढे नेले पाहिजे. शोषक समाजव्यवस्थेत बदल घडवून समता, न्याय प्रस्थापित करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला पाहिजे. दुबळ्या समाजाने तंत्रज्ञानाचे सामथ्र्य वापरले नाही तर समतेची लढाई जिंकता येणार नाही. त्यासाठी ही साधनसामग्री अत्यंत वेगाने आत्मसात केली पाहिजे. त्यापासून दूर राहणाऱ्यांचा टिकाव लागणार नाही. तोफा आल्यानंतर हत्ती-घोडय़ांचे, सैन्याचे पानीपत झाले हे ध्यानात घेतले पाहिजे. नवीन तंत्रज्ञान वापरताना त्यातील धोक्यावर मात करण्याचा विचारही केला पाहिजे असे डॉ. साळुंखे यांनी सांगितले.संतोष देशपांडे यांनी ‘सोशल नेटवर्किंग’च्या सामाजिक क्रांतीची माहिती दिली. दीपा देशमुख यांनी ‘युनिकोड’, सुदाम चौरे यांनी ‘सायबर क्राईम’बाबत घ्यावयाची खबरदारी यावर तर शुभानन गांगल यांनी शोध मराठीचा प्रयत्न प्राणवायू फॉन्ट येत्या २७ फेब्रुवारीस ‘लाँच’ होत असल्याची माहिती दिली. यमाजी मालकर यांनी कार्यशाळेचा हेतू विषद केला. सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय मांडके यांनी स्वागत केले. हरिष पाटणे यांनी सूत्रसंचालन व विनोद कुलकर्णी यांनी आभार मानले.

No comments: